TOD Marathi

मुंबई | महाराष्ट्रात मागील वर्षभराच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, औद्योगिक गुंतवणुकीत पीछेहाट झाली, बेरोजगारी वाढली, मात्र तरीही कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता न दाखविणारे शिंदे-फडणवीस यांचे हे ‘कुराज्य’ लवकरात लवकर जावे, हीच राज्यातील जनेतची इच्छा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशध्याक्ष नाना पटोले यांनी केली.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडले व राज्यात असंविधानिक मार्गाने स्थापन झोलल्या शिंदे-फडणवीस सरकारने एक वर्ष पूर्ण केले. वर्षभरात या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नाही. अतिवृष्टी व गारपीटीने शेतकरी संकटात सापडला असताना सरकार मदतीची केवळ घोषणा करते पण एक दमडीही शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही. शिंदे सरकारच्या जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यांच्या काळातच राज्यात १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याला या सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे.

हेही वाचा” …मोर्चा निघणारच… ठाकरे गट ताकद दाखवणार; मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर प्रहार”

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यांत २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबईसारख्या महानगरात दिवसाढवळय़ा लोकलमध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, असे पटोले म्हणाले.